काश्मीरची शांतता भंगली   

पहलगामचा दहशतवादी हल्ला जम्मू आणि काश्मीरच्या शांततेचा भंग करणारा ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवाया कमी झाल्या होत्या. घुसखोरी आणि चकमकी झाल्या. परंतु, प्रत्यक्ष पर्यटकांवरील   पहिलाच हल्ला  ठरला आहे. पर्यटकांना वेचून ठार करण्यात आले.  पर्यटकांबरोबरच व्यावसायिकां-समोर आता संकट उभे ठाकले आहे. एकंदरीत काश्मीरची शांतता दहशतवादी कृत्यामुळे भंगली आहे. 
 
जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यानंतर लोकनियुक्त सरकार सत्तेवर नुकतेच आले. केंद्र सरकार आणि लष्कराने कडक कारवाई करुन दहशतवाद्यांचा खात्मा देखील केला आहे. दहशतवाद्यांना दयामाया न दाखवता कठोर कारवाईचे आदेशही सरकारने दिले होते. त्यामुळे दहशतवाद आता काही भागांपुरता मर्यादित राहिला देखील होता. पण.,अचानक सुरक्षेतील त्रुटीचा फायदा उठवून दहशतवाद्यांनी इप्सित साध्य केले आहे. हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे. हजारोंच्या संख्येने जीवाच्या भीतीने त्यांनी काश्मीर खोर्‍यातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका थेट पर्यटनावर अवलंबून असणार्‍या व्यावसायिकांना बसणार आहे. एका हल्ल्यानेे दहशतवाद्यांनी त्यांचे उद्दिष्ट साध्य केले असले तरी भारतीयांनी त्या विरोधात एकवटणे हाच एक पर्याय आता उरला आहे. काश्मीरची शांतता तूर्त भंग पावली आहे. मात्र, ती नांदावी यासाठी भारतीयांनीच प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. दहशतवादाविरोधात कठोरपणे उभे राहिले तर त्याचा सामना करणे शक्य हाईल. पर्यटनस्थळांना सुरक्षा देण्यासाठी पावले उचलावीत. त्याद्वारे त्यांचे संरक्षण होईल. त्यांच्या सुरक्षेची भावना निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. 

पंचवीस वर्षांपूर्वी पर्यटकांवर पहिला हल्ला

दहशतवाद्यांनी आतापर्यंत केवळ सुरक्षा रक्षक आणि  नागरिकांना लक्ष्य केले होते. २००० मध्ये पर्यटकांवर एक हल्ला झाला होता. तो वगळता असे हल्ले गेल्या काही दिवसांत झालेले नाहीत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यावर दहशतवादावर अंकुश आला. पर्यटनाला अधिक चालना मिळाली. त्यामुळे पर्यटन उद्योग तेथे बहरला आहे. कडेकोट  लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे दहशतवाद नावापुरता उरला आहे. नागरिकांनी दहशतवादाला थारा दिला नाही. शांततेसाठी नेहमीच आग्रह धरला. तशी मनीषाही अनेकदा त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत केले. त्याचे दूरगामी परिणाम व्याप्त काश्मीरमध्ये उमटले होते. तेथे भारतात सहभागी होण्यासाठी जोरदार निदर्शनेही तेथील नागरिकांनी अनेकदा केली होती. त्यामुळे पाकिस्तान सरकार, दहशतवादी म्होरके यांचे पित्त खवळले. सुरक्षेतील त्रुटीचा फायदा उठवून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला चढविल्याचे दिसते आहे.
 

Related Articles